शुभांगी पासेबंद
एप्रिल फूल हा सण, उत्सव, खरं तर भारतीय नाही. पण, परकीयांच्या आक्रमणांमुळे आणि त्यांच्या आपल्यावरील छापाने झालेल्या सांस्कृतिक आक्रमणामुळे जे व्हॅलेंटाईन डे, न्यू इयर वगैरे असे सण आपण साजरे करतो, त्याच्यात एप्रिल फूल हा गमतीशीर, हसरा सणदेखील आला.
तसे या सणाला महत्त्व फार वेगळेच आहे. १ एप्रिलला जेलमधल्या कैद्यांना सोडून द्यावे, असा काहीतरी मस्करी करणारा आदेश, जेलमध्ये, परदेशांमध्ये निघाला होता आणि त्यानंतर एप्रिल फूल हा गमती करायचा आणि दुस-याला फूल म्हणजे मूर्ख बनवण्याचा दिवस निर्माण झाला.
भारतीय सण-संस्कृतीनुसार एप्रिल महिन्यात साधारणपणे अक्षय्य तृतीया आणि गुढी पाडवा येतो. ग्रीष्म ऋतूची सुरुवात झालेली असते. गर्मी खूप वाढते आहे. ग्लोबल वॉर्मिग ओझोन लेअर वगैरे ही शास्त्रीय कारणं आहेत. पण, खरं सांगायचं तर निसर्गाचा तोल बिघडला आहे. तो बिघडवायला आपण माणसंच कारणीभूत आहोत. लोभी माणूस झाडे तोडू लागला. हिरवाई बघून आपल्याला बरं वाटतं, पण सिमेंटची जंगल वाढवू लागला. जंगले ही या पृथ्वीवर कित्येक हजारो वर्षापासून होती, मात्र माणसाला घर बांधायला वाढत्या लोकसंख्येला उपयोगी हवे म्हणून जागा, सरपण म्हणून उपयोगी होण्यासाठी लाकूड हवं म्हणून झाडांची कत्तल केली गेली. परिणामी गर्मी वाढली. विहीर कमी भरली, पाऊस कमी झाला. विहीर वाहून गेली म्हणजे पाऊस भरपूर झाला. अशा सोप्या प्रकारात पर्जन्यमान मोजले जाई. आता मोजमाप सुधारले, पावसाचे तंत्र बिघडले.
हल्ली फक्त पन्नास टक्के पाणी जमिनीत मुरते आणि बाकीचे पाणी चक्क वाहून जाते. हे पाणी वाचवण्यासाठी जमिनीवर अधिकाधिक झाडे, रोपे, मोठय़ा प्रमाणावर लावली पाहिजेत. जंगलं वाचवायला हवीत, जंगलातून माणसांना खूप औषधी वनस्पती मिळतात. पृथ्वीवरचे हरित आवरण जंगलांमुळे राखले जाते. प्राणवायू मिळतो आणि गारवा देखील निर्माण होतो. एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल कसे करावे?
>> एक तरी झाड लावावे आणि मुख्य म्हणजे ते जगवावे, वाढवावे.
>> पाण्याचे माठ सर्वत्र पाण्याने भरून ठेवावे. पक्षांसाठी पाण्याची भांडी ठेवावी.
>> वातानुकूलित यंत्राचा अतिरेक टाळावा. आवश्यक तितक्याच तापमानावर वातानुकूलित यंत्र चालवावे.
>> आवश्यक तेवढीच वीज वापरावी. गरज असेल तरच पंखा लावावा आणि वेळीच बंद करावा.
>> शक्य तेवढा हिरव्या झाडांनी आणि हिरव्या मार्गानी गर्मी कमी करण्याचा प्रयत्न करावा. भगीरथ प्रयत्न हा शब्द यावरून झाला की, खूप प्रयत्न केल्याशिवाय पाणी वाचवलं जात नाही.
>> पाण्याची उधळमाधळ टाळावी
>> निसर्गाला लुबाडणे बंद करावे आणि निसर्गाची जोपासना आणि संवर्धन करावे
>> बघा एप्रिल कूल व्हायला वेळ लागत नाही, लागणारही नाही. वाढदिवस, लग्न समारंभ यावेळी एखादे झाड लावावे.
>> एखाद्या स्वयंसेवी संघटनेला दान देऊन एखादे झाड लावायला आणि जगवायला मदत करावी.
>> कचरा जाळू नये. धूर करू नये.
>> सूती वस्त्र, वाळा, कोकम सरबत, नारळपाणी, माठ, पडदे या उपायांनी कूल राहावे.
तर एप्रिल कूल बनण्यासाठी प्रयत्न करणार ना! चला कामी लागू या.